Saturday, February 27, 2016

टेक्नोफंडा मुलांचा घात करतोय…

‘‘मला कळत नाही, पण माझ्या दोन वर्षांच्या मुलाला ‘मोबाईल’मधलं सगळं कळतं…’’ कौतुकलेले हे वाक्य प्रत्येक घरातून ऐकायला मिळते, पण हे कौतुकच आता भारी पडतंय महाराजा… उद्याचं भविष्य असणारी ही पिढी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि तत्सम गॅजेट्सच्या वापरामुळे बरबाद होत आहे…
‘तंत्रज्ञान घातक, घातक…’’ अशी ओरड बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे, पण तरीही तिकडे कानाडोळा करताना नव्या पिढीच्या हातात तंत्र सोपविण्याची घाई प्रत्येक पालकाला आहे. मात्र हे किती धोकादायक आहे याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येऊ लागले आहे. मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू देणे चुकीचे असल्याचे मत ‘दी अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक अ‍ॅण्ड दी कॅनडियन सोसायटी’च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर व्यक्त केले आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा… तरुणाईला वाचवा…
– शून्य ते दोन वर्षांपर्यंत लहान मुलांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो. नव्या गोष्टींबद्दल मुलांना मोठं कुतूहल असतं. मोबाईल फोन, इंटरनेट, टॅबलेट, टीव्ही अशा घरातल्या वस्तू कशा वापरल्या जातात ते पाहून त्यापासून ते प्रेरणा घेत असतात. मात्र मेंदू पूर्ण विकसित झालेला नसल्याने या प्रगत तंत्रज्ञानापासून मुलांना इजा होण्याचीच शक्यता जास्त.
– तंत्रज्ञान सतत बदलत असते. त्यात तीन मुलांपैकी एक मुलगा अशिक्षित राहतो अशी आकडेवारी आहे. शिक्षण नसल्याने व्यक्तिमत्त्व विकास खुंटतो. शैक्षणिक पात्रता नसलेल्या मुलांच्या विकासात इलेक्ट्रॉनिक उपकरणे हानिकारक असतात.
– मुलांना त्यांच्याच खोलीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू दिल्यास ते लठ्ठ होण्याचा धोका जास्त… लहान वयातच इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळू लागल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढते. लठ्ठपणामुळे फार कमी वयातच मुलांना डायबेटीस, हृदयविकार असे विकार जडतात.
– आपली मुले कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत आहेत याची ६० टक्के पालकांना कल्पनाच नसते. किमान ७५ टक्के मुले पालकांच्या नकळत आपापल्या खोलीत गॅझेटस् वापरत असतात. त्यामुळे मुलांमध्ये निद्रानाशाचा विकार कधी जडतो याची त्या पालकांना कल्पनाही नसते.
– तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मुलांना मानसिक आजार जडण्याची भीती असते. तत्पूर्वी या मुलांमध्ये तणाव, चिंता, अस्वस्थता, व्यग्रता ही लक्षणे दिसू लागतात. पण पालकांच्या ती लक्षात आली नाहीत तर मुलांचे मानसिक आजार वाढतात.
– नवनवे तंत्रज्ञान माहीत असले की मुले आक्रमक होण्याचा धोका असतो. कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा लैंगिक आक्रमण करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. स्वत:च्या खोलीत पालकांच्या नकळत मोबाईल किंवा टीव्हीवरच्या बातम्या, शोज पाहून अलीकडे मुले तोच प्रकार स्वत: करून बघतात.
– शाळेत अभ्यास आणि घरात वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे… यामुळे मुले कन्फ्युज होतात. नेमके कोठे लक्ष द्यावे, काय करावे हे लक्षात न येऊन ते एकाग्र होऊ शकत नाहीत. त्यांना वेड लागू शकते. ते धड शिकूही शकत नाहीत. घरातल्या गॅझेटस्चा हा फार मोठा धोका असतो.
– कामाच्या गडबडीत पालकांचे मुलांकडे लक्ष राहात नाही. पालक दुर्लक्ष करत असल्याने मुले इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मन रमवतात. यामुळे नकळत त्यांना या गॅझेटस्चे व्यसन जडू शकते. प्रत्येक ११ मुलांपैकी एका मुलाला हे व्यसन जडलेले असते.
– मोबाईल फोनसारख्या वायरलेस उपकरणांतून निघणार्‍या रेडिएशनमुळे जागतिक आरोग्य संघटनेने मे २०११मध्ये काही वस्तूंना ‘२बी रिस्क’ गटात टाकले आहे. या वस्तूंमुळे मोठ्यांपेक्षा लहान मुलांच्या मेंदू आणि पचनशक्तीवर घातक परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०२१६

पहाटेचा शिरा

तळकोकणातील सावंतवाडीच्या भारतमातेतील पहाटेचा शिरा एव्हाना संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे. पहाटेच्या प्रहरी चार वाजता मिळणार्‍या या स्वादिष्ट शिर्‍याला पन्नास वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. सावंतवाडी व परिसरात या शिर्‍याने तृप्त होऊन कित्येकजण आपल्या दिवसाची गोड सुरुवात करतात.
सहदेव रघुनाथ मांजरेकर (वय ९२) यांनी १९५७ साली स्थापन केलेले ‘भारतमाता हॉटेल’ हे सावंतवाडीच्या खाद्यप्रवासातील मैलाचा दगड ठरले आहे. बेळगाव, कोल्हापूर व गोव्याकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहतूकदारांची गरज म्हणून हा शिरा इतक्या पहाटे उपलब्ध होतो. मात्र गेली पन्नास वर्षे निव्वळ शिरा खाण्यासाठी पहाटे उठणारे कित्येक सावंतवाडीकर आपल्याला भेटतील.
शिर्‍याबरोबरच झुणका आणि नाचण्याची भाकरी, आंबोळी-उसळ, खाजे असे टिपिकल मालवणी पदार्थही भारतमातेत आपल्याला चाखायला मिळतात. त्याशिवाय पुरीभाजी, झणझणीत बाकरवडी, भक्कम पेढा, खव्याचा पेढा असे पर्याय आहेतच. मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे आमच्या भटारखान्याचे पहाटे साडेतीन ते बारा असे बिझी शेड्यूल असल्याचे संचालक जगदीश मांजरेकर गमतीने म्हणतात. गेली सलग पन्नास वर्षे स्वादिष्ट चव मेेंटेन करण्याची जबाबदारी जगदीश हे आपले भाचे मंदार व गौरवसह लीलया पार पाडतायत. पर्यटनासाठी गोव्यात किंवा सिंधुदुर्गात जात असाल तर या स्वादिष्ट शिर्‍याची चव नक्की चाखा. त्यासाठी मात्र भल्या पहाटे उठावे लागेल.

शाम देऊलकर

सौजन्य :-  फुलोरा , सामना २६०२१६

कल्याणगड

धुमाळवाडी गावातून गड चढताना डावीकडे पाण्याचे एक खांबटाके आहे. गावातून तासाभरात आपण गडाच्या भक्कम दरवाजात येऊन पोहोचतो. गडाच्या दरवाज्यापर्यंत येणारा रस्तासुद्धा आपल्याला इथेच येऊन मिळतो. गडाच्या दरवाजाला सध्या गडावर मुक्कामास असलेल्या साधुबाबांनी लोखंडी गेट बसवले आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला उतरत गेलेल्या पायर्‍या दिसताच. कल्याणगड किल्ल्यावर हे भुयारवंजा मंदिर असून सुमारे शंभर फुट आत गेल्यावर समोर दत्तात्रेय,पार्श्‍वनाथ व पद्मावती देवीची मूर्ती आहे. हे भुयारी मंदिर हेच कल्याणगड किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. पूर्वी ह्या भुयारात गुडघाभर पाण्यातून जावं लागत असे पण आता भुयारातील पाणी उपसून काढण्यात आले आहे. भुयार बघून बाहेर आल्यावर पुढे आपण बालेकिल्ल्याच्या भक्कम दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. समोरच मारुतीचे मंदिर आहे. बालेकिल्ल्यावर पाण्याची टाकी,वाडयाचे अवशेष,कोरीव दगड,चुन्याचा घाणा,सदरेचे अवशेष,एक पीर,भग्न तटबंदी,धान्यकोठार व एक तलाव असून समर्थ रामदासांचे शिष्य असलेल्या कल्याणस्वामींची समाधी आहे. त्यांच्या नावावरूनच गड कल्याणगड नावाने ओळखला जातो. गडावर प्रचंड मोठा नांदुरकी नावाचा वृक्ष असून तो सातारा परिसरातून कुठूनही सहज नजरेस पडतो. ह्या नांदुरकीच्या झाडामुळेच कल्याणगडाला नांदगिरी असेही एक नाव आहे. गडमाथ्यावरून चंदन-वंदन किल्ले,जरंडेश्‍वर,अजिंक्यतारा किल्ला, वर्धनगड व सातारा शहराचं अतिशय सुंदर दृश्य दिसतं. कल्याणगडावर आता गाडी जात असल्याने तसेच भरपूर अवशेष व विस्मयकारक असे जलमंदिर अतिशय प्रेक्षणीय असल्याने एका दिवसात नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा हा ट्रेक धम्माल आणतो.
विशेष सूचना
– भुयाराच्या आत जाताना त्याच्या कड्यावर मधमाशांची पोळी असल्याने अजिबात गोंधळ करू नये तसेच कोणत्याही प्रकारचा धूर करू नये.
– कल्याणगड किल्ल्याला जोडून जवळपास बघण्यासारखी भरपूर ठिकाणे असून त्यात सातार्‍याचा अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, जरंडेश्‍वर डोंगर, पाटेश्‍वर, यवतेश्‍वर, वर्धनगड- महिमानगड, लिंब खिंड गावाजवळच्या शेरी गावातील बारा मोटेची विहीर ही अतिशय प्रेक्षणीय व चुकवू नये अशी ठिकाणे आहेत.
जायचं कसं
पुणे-बंगलोर महामार्गावर सातारा रोड गावाकडे जाणारा फाटा आहे. तिथून पुढे सुमारे वीस किलोमीटर्सवर असलेले सातारा रोड स्टेशन गाठावे. सातारा रोड स्टेशन वरून किन्हई गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर धुमाळवाडी गाव आहे. तिथून तासाभरात किल्ल्यावर जाता येते. तसेच किल्ल्याच्या शेजारच्या डोंगरावर सध्या पवनचक्क्या झाल्याने गडाच्या दरवाजापर्यंत मोठा लाल मातीचा रस्ता तयार करण्यात आला आहे ज्यामुळे आता चारचाकी वाहनाने सुद्धा गडाच्या वरपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.
जेवणाची सोय : गडावर जाताना जेवण सोबत घेऊन जावे किंवा पुणे- बंगलोर महामार्गावर जेवणासाठी हॉटेल्स आहेत तसेच कल्याणगडाच्या पायथ्यालाही जेवणासाठी हॉटेल आहे.
पाण्याची सोय : गडावर पाणी उपलब्ध आहे.
ओंकार ओक
सौजन्य :- फुलोरा, सामना २६०२१६