Wednesday, December 30, 2015

पॅनकार्ड तुमच्या खिशात ठेवा!

 नवीन वर्षात सगळेच काही बदलते. पहिल्यांदा भिंतीवरील कॅलेंडर बदलते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने पॅनकार्डच्या वापराचे नियम बदलण्याचे जाहीर केले आहे. १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल. गरीब असो की श्रीमंत पॅनकार्ड ही आता अत्यावश्यक बाब बनली आहे. बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड तर लागतेच पण इतर आर्थिक व्यवहार करतानाही ते पॅनकार्डशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. पॅनकार्डची ही बहुआयामी ओळख आता १ जानेवारीपासून बदलणार आहे. म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांची कुंडली पॅनकार्ड मांडणार आहेच, पण हे कार्ड कुठल्या व्यवहारांसाठी अत्यावश्यक आहे याचे मापदंड मात्र बदलले आहे. गरीब असो की श्रीमंत, सर्वांनाच ते उपयुक्त ठरावे म्हणून ही माहिती… १ जानेवारीपासून पॅन कार्डची गरज कधी?

Monday, November 23, 2015

दिशादर्शन : नैऋत्य

  
 
नैऋत्य दिशेचा पालक विश्‍वपती, तर या दिशेची रास कन्या आहे. दिशेचा रंग धूम्र, तर या दिशेचे तत्त्व पृथ्वीतत्व असते. दिशापालकाची पत्नी दीर्घादेवी असून त्याचे वाहन नर असल्याचे पुस्तकांत नमूद आहे.
नैऋत्य दिशेला घराची बांधणी असेल तर आरोग्य चांगले लाभते असं म्हणतात. या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंच असणं शुभ मानलं जातं. या दिशेला उंचीवर कचराकुंडी असणं मात्र अशुभकारक असतं म्हणे. या दिशेला शौचालये बांधली तरी कुटुंबाला अशुभ फल मिळते. नैऋत्य दिशेकडे उतार असल्यास सर्व प्रकारची अशुभ फळं मिळतात. या दिशेला रिकामी जागा सोडली असेल तर फारच वाईट अनुभव येतात असं भाकित केलं जातं.
दिशांच्या अष्टलक्ष्मीमध्ये नैऋत्य दिशेचे स्थान धैर्यलक्ष्मीचे असल्याचे म्हटले आहे. नैऋत्येला जीना असेल तर शुभ आणि तेथे व्हरांडा असेल तर वाईट फळ मिळते. या दिशेला सरहद्द भिंतीवर मजला बांधला तर चांगले आरोग्य प्राप्त होते. नैऋत्येला इलेक्ट्रीक मीटर असेल तर अपघातांचा संभव जास्त असतो. वाहनतळ असल्यास शुभ फळ असते. घराच्या छपराचा उतार असल्यास हत्या, आत्महत्या घडतात असं बोललं जातं. या दिशेला डायनिंग हॉल व स्वयंपाकघर असेल तरीही अशुभ फळं मिळतात.
या दिशेला विहीर, संडास, सेप्टीक टँक असणं तसेच सर्व दिशांपेक्षा नैऋत्येला उतार असल्यास व्यसन अपकिर्ती, ग्रहपीडा, पिशाच्च बाधा, दृष्ट स्रियांचा संग, चर्मरोग, मृत्यू इ. भोगावं लागतं. ही दिशा इतर सर्व दिशांपेक्षा उंच असून त्या भागात स्टोअर रूम, जड वस्तू, कचराकुंडी आदी ठेवणं हितकारक मानलं जातं.

सौजन्य :- फुलोरा, सामना २०१११५

टेस्ट में बेस्ट!


नेहमी काहीतरी नवं हवं असतं… तोच त्यांचा वेगळेपणा असतो. आता दिवाळीचंच घ्या… कुठेही गेलं तरी फराळच समोर येतो. फराळातील तेच ते नेहमीचे पदार्थ किंवा तोच तो नेहमीचा ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा येणं स्वाभाविकच… यातच काहीतरी वेगळं, समथिंग न्यू करता आलं तर… पण हे न्यू म्हणजे नेमकं काय तर काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची.. वेगळा चविष्ट पदार्थ खायला सर्वांनाच आवडेल… या वेगळ्या डिश जाणून घ्यायच्या तर दुसर्‍या राज्यांमधल्या ब्रेकफास्ट स्पेशॅलिटी माहीत करून घ्यायला हव्यात. त्यामुळे होईल काय, नवीन पदार्थही खायला मिळेल आणि नेहमीच्या टेस्टपेक्षा बेस्ट अनुभवायला मिळेल.
आंध्र प्रदेशचा ‘पेसारट्टू’ हा पदार्थ एकदम प्रसिद्ध… थोडक्यात आपल्याकडे डोसा मिळतो ना, त्यासारखाच… पण तो तिकडे मुगाच्या डाळीपासून बनवतात. भिजवलेल्या मुगाची डाळ आणि तांदूळ घेऊन त्यात बटर, कांदा, हिरवी मिरची, आलं यांचं वाटण घालायचं. या सगळ्या मिश्रणाचा डोसा बनवायचा. मस्तपैकी ओल्या खोबर्‍याच्या चटणीबरोबर तो गरम गरम खाल्ला तर ‘वा, क्या बात हैं’. घरात बसून आंध्रचा पेसारट्टू खाल्ल्याचे समाधान नक्कीच मिळेल.
कांदे-पोहे, बटाटा-पोहे, साबुदाणा खिचडी हे पदार्थ महाराष्ट्रीयनांच्या नाश्त्यात असतातच, पण हल्ली वेळ वाचवायचा म्हणून झटपट पदार्थ करण्याकडे कल असतो. त्यातलाच एक म्हणजे ब्रेड-उपमा. काय करायचं माहितीय? ब्रेडच्या स्लाईसचे छोटे तुकडे करायचे. कढईत मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. वरून हिरवी मिरची, चवीपुरते मीठ, कांदा घालायचा. ब्रेडचे तुकडे घालून चिमूटभर साखर घालायची. त्यावर झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मंद आचेवर ठेवावी. वरून लिंबाचा रस, कोथिंबीर घातली की, गरमागरम ब्रेड-उपमा तयार…
केरळचा ‘पुट्टू’ घरी बनवायचा असेल तर अगदी सोपा आहे. तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तांदळाचे पीठ गरम पाण्यात मळायचे. पुट्टू बनवण्यासाठी पुट्टू मेकर असेल तर उत्तम. त्यात चमचाभर खोबर्‍याचा कीस, त्यावर तांदळाचं पीठ घालायचं. पुन्हा त्यावर खोबर्‍याचा कीस घालायचा. तो गोल पूर्ण भरल्यावर वरून झाकण लावायचे. शिजल्यानंतर रोल करून कोणत्याही कडधान्याच्या रश्श्यासोबत खायचा… लय भारी!
कश्मीरचा ‘स्वीट पनीर पराठा’ हा पदार्थही प्रसिद्ध आहे. गव्हाच्या पिठाची चपाती लाटून त्यावर साखर पसरवावी आणि तो गोळा पुन्हा मळून लाटायचा. किसलेले पनीर, साखर, ड्रायफ्रुट्स, सुक्या खोबर्‍याचे तुकडे एकजीव करून लाटायचे आणि भाजून घ्यायचे. हा पदार्थ बनवायला एकदम सोपा आणि झटपट तयार होतो. चहासोबत खाल्ला तर त्याची टेस्ट काही औरच!
गोव्यात नाश्त्यात ‘टोनक-पाव’ नावाचा पदार्थ खातात. हे टोनक-पाव म्हणजे आपली पाव-भाजीच. कढईत बटाटा, कांदा, चिंच, खोबरे, गरम मसाला भाजून घ्यायचे. नंतर तेल टाकून उभा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. त्यामध्ये किसलेले खोबरे लाल होईपर्यंत परतायचे. नंतर मसाला व खोबरे मिक्सरला लावून घ्यायचे. कढईत तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्यात उकडलेले कडधान्य, उकडलेला बटाटा टाकायचा आणि शेवटी वाटण घालायचे. एक उकळी आली की, टोनक तयार…
बिहारमध्ये ‘सत्तू पराठा’ म्हणून प्रसिद्ध आहे. गहू आणि चण्याच्या पिठापासून तयार केलेल्या सत्तूच्या पिठात बारीक कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मसाले घालायचे. त्यात थोडं मीठ आणि पाणी घालून पीठ मळायचं. नंतर त्यात कणकेचा गोळा मिसळून तो खोलगट करायचा. त्यात सत्तूचे सारण भरून पराठा लाटून घ्यायचा. तो तव्यावर दोन्ही बाजूंनी खमंग भाजून त्यावर तूप लावायचे.
पश्‍चिम बंगालमध्ये ब्रेकफास्टमध्ये ‘राधाबल्लवी’ हा पदार्थ खातात. हा पदार्थ घरच्या घरी चाखायचा असेल तर उडदाच्या डाळीमध्ये वेगवेगळे मसाले घालून पुरी बनवायची. नेहमीच्या छोट्या पुर्‍यांपेक्षा आकाराने थोड्या मोठ्या पुर्‍या बनवायच्या. या पुर्‍या अगदी सॉफ्ट आणि मस्त लागतात. ही पुरी भाजीसोबत किंवा रश्श्यासोबत खायला एकदम टेस्टी.

सौजन्य :- फुलोरा, सामना २०१११५

Saturday, June 06, 2015

चायनीज किंवा थाय... झकास ‘वोक हाय’






येस सर...मिचमिच्या डोळ्याची चायनीज वाटणारी मुलगी दरवाजा उघडताच आदराने, पण इंग्रजी स्वागत करते... आणि मग वेटरपासून मॅनेजरपर्यंत दिसतात ते सगळेच ‘चायनीज’... इथं खरं चायनीज मिळणार हे पहिल्या फटक्यात उमजून जातं. मग ‘वोक हाय’मधला पुढचा टप्पा सुरू होतो.
सुरुवातीलाच ‘स्पेशल मंगोलियन सूप’... हळदीच्या रंगाचं. गाडीवर असा रंगही कधी दिसत नाही. त्यामुळे मनात संशय...‘नो सर’ लगेच खुलासा. ‘आम्ही रंग वापरत नाही. कुठलाही अनहायजेनिक किंवा केमिकल पदार्थ आमच्याकडे वापरला जात नाही. ना सॉसमध्ये ना सूपमध्ये. थेट कंपनीकडून घेतलेल्या ‘सॉस’बद्दल मी बोलणारच नाही, कारण ‘फूड ऍण्ड ड्रग’कडून मंजूर असलेले पदार्थच आम्ही वापरतो,’ हरी कोटीयन यांनी लगेच सांगून टाकले. संशय फिटला.
अन् मग खाताखाताच कोटीयन कुटुुंबाचा रुईयासमोरील ‘डीपी’ज... किंवा दुर्गा परमेश्‍वरीपासून ते अगदी आजच्या ‘वोक हाय’पर्यंतचा इतिहास हरी कोटीयन आणि त्यांचे मोठे बंधू प्रसाद कोटीयन यांनी सांगून टाकला. वयाच्या १६/१७ वर्षांपासून या दोघांनी कष्टाला सुरुवात केली. आज मुंबईत डीपीसह त्यांची ४ हॉटेले आहेत. चायनीज आणि थाई जेवणात त्यांचा हातखंडा आहे. मेहनतीचे आणि अभ्यासाचे फळ आहे. तिसरा भाऊ विनायक कोटीयनही आता गप्पात सहभागी झाला...
‘बिग बझार’ लोअर परळच्या समोरच आता त्यांनी ‘वोक हाय’ची शाखा सुरू केलीय. गंमत म्हणजे पहिल्या दिवसापासून ‘तरुणाई’ने इथले थाई फुड फुल एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. गप्पा मारता मारता सूप संपलं होतं आणि पुढ्यात खास ‘फ्रूट बीअर’ आली होती. दहावी-बारावीतली तरुणाई परवाच पार्टी करून गेली ‘फ्रूट बीअर’ची. त्यांची त्यांच्यापुरती एन्जॉयमेंट - नो अल्कोहोल फक्त फळांचा रस, पण दिसणं आणि फेसाळणं बीअरसारखंच मुलांना काय, करतात मजा.
‘वोक हाय’चा मेन मेनू म्हणाल तर बांबू राईस आणि ‘थाय किंवा बर्मीज’ करी. या करीजसाठी वापरलं जाणारा नारळाचं दूध खास थायलंडवरून आणलं जातं. त्यामुळे जाडसर ग्रेव्हीच्या या ‘करी’ज फार वेगळ्या असतात...पण त्यात चमचमीतपणा कमी असतो. ज्याला तिखटच हवं त्याने ते सांगायचं.
सुरुवातीला सूपमध्ये मंगोलियन सूपप्रमाणेच तिबेटी सूप ‘भूलुंग’ हा प्रकारदेखील ट्राय करायला हरकत नाही. ‘चिकन मोमोज’ हे स्टार्टर भन्नाटच स्टार्टर्सनंतर मेन कोर्स. नुडल्समध्ये ‘मलेशिअन फ्लॅट नुडल्स’ हा वेगळाच आणि जरासा तिखट प्रकार त्याच्या जोडीला ‘प्रॉंझ करी’ मुद्दाम मागवायची मजा येते. इथं उकडा तांदूळ नाही, कलर्स नाही आणि ‘अजिनोमोटो’ खवय्यास हवं तरच वापरलं जातं. त्यामुळे आधी खवय्याच्या आरोग्याची काळजी इथं घेतली जाते. चायनीज किंवा थाई पदार्थात स्पेशल फिश डिशही भारीच. रावस किंवा पापलेट थाई स्टाईल इथलं प्रसिद्ध आहे. ‘प्रॉन्स राईस तर मस्तच.
याखेरीज येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोअर परिसरातील कॉर्पोरेट दुनियेला खूश करणारी त्यांची ‘पार्सल’ पद्धती. ऑफिसेसला लागणारी पार्सल देताना आता खास ऑफिस पॅक, फॅमिली पॅक आणि पार्टी पॅक असा प्रकार त्यांना पुढे आणला आहे. ही खरं तर हैदराबाद बिर्यानी स्टाईल आहे. तिथं १० जणांचं बिर्यानी पॅक दिलं जातं. त्याचप्रमाणे एखाद्या ऑफिसला १२ जणांचं जेवण हवं तर तसा पॅक; कुणाच्या फॅमिलीत सहाजणांना तर तसं फॅमिली पॅक. पार्टी असेल तर तसं पार्टी पॅक. याखेरीज कूपन सिस्टीमही आहेच. त्यामुळे कार्पोरेट लाईफसाठी फंडा एकदम झकास. चवीलाही आणि वेळेलाही. शेवटचा प्रॉन्झ तोंडात टाकताना चवीचं पटलंही आणि वेळेचं म्हणाल तर ज्याच्या त्याचा अनुभव.


सौजन्य :- सामना ०६०६१५ 

ताक - आयुर्वेद





दही रोज खाऊ नका, पण रोज ताजं ताक प्यायलात तर चालेल हे घरातल्या मोठ्यांना बोलताना ऐकलं असावं. दही नको, पण दह्यापासून तयार होणारं ताक चालतं, हा विचारात टाकणारा प्रश्‍न, पण तो अगदी बरोबर आहे.
दही मुळात उष्ण, चिकट पचायला जड आणि रक्त खराब करण्यास अग्रेसर म्हणून ज्यांना ऍलर्जीमुळे सर्दी होते त्यांच्यामध्ये खूप दही खाण्याचा इतिहास दिसतो. ताक हा मुळात मंथनातून तयार होणारा भाग आहे. शास्त्रामध्ये सांगताना ताक हलके, किंचित तुरट व आंबट वातनाशक, कफघ्न व अग्नी वाढवणारा असून सूज, मूळव्याध, मूत्ररोग, दाह, बालरोग, अरुची, प्लीहावृद्धी, पांडू गुल्म व विषजन्य विकार यांचा नाश करतो. तापामध्ये मंदावलेली भूक, जिभेची चव आणि उत्साह परत आणण्यासाठी ताकात तयार केलेला मऊ पातळसर भात हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर आहे. उष्णतेमुळे शरीराचे कमी झालेलं पाण्याचे प्रमाण आणि शारीरिक थकवा दूर करणारं ताक हे सर्वोत्तम पेय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुर्वेदात मानसिक कारणामुळे होणार्‍या सोरयासिससारख्या त्वचा विकारात (आमलकी+मुस्ता) यात तयार केलेल्या ताकाच्या शिरोधारेचे उत्तम काम आहे हा अद्भुत योग आहे. धणे-जिरे पावडर व हिंग टाकून तयार केलेले ताक अन्न पचनास फायदेशीर असून पोटात गॅस जमा होऊ देत नाही.
आता तुम्ही ठरवा, शरीरात तुफान निर्माण करणारी थंड पेये घ्यावीत की घरच्या घरी उपलब्ध होणारं आणि मंथनातून तयार होणारं ताक घ्यायचं.
- वय वर्षे २६, अनियमित मासिक पाळी आणि अतिप्रमाणात रक्तस्राव असतो. उपाय सांगा. (आशा कुलकर्णी) ठाणे
- आपणास नाडी परीक्षण करून औषध घेण्याची आवश्यकता आहे. आपणास वैद्यकीय सल्ल्यानुसार शरीरशुद्धी औषधी योजना आणि आहार नियोजन करणे आवश्यक आहे. मासिक पाळीची पथ्य पाळून औषधी घेतल्यास हा त्रास लवकर बरा होतो.
सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५ दीपक केसरकर

हृदय दिवाणे सांभाळू! पुढे धोका आहे...

  बदललेली लाइफस्टाइल आणि फास्ट फूडच्या लागलेल्या सवयी आता तरुणाईला महागड्या ठरत आहेत. पळत्या लाइफमुळे त्रास वाढतोय. तर वेळीअवेळी अरबट चरबट खाल्ल्यामुळे स्वास्थ्य बिघडतेय. परिणामी हृदयावर ताण पडतोय... त्यामुळे वेळीच सावध... कारण पुढे धोका आहे...
मे महिना संपला... आता पावसाळा सुरू होईल. वातावरण बदलेल. नियम शिथिल होतील. बंधनं मोकळी होतील... जीभ चटावेल. रस्त्यावरच्या पावभाजीकडे म्हणा किंवा इतर फास्ट फूडकडे नजर जाईल. पण नकोच ते! आपल्याला आपल्या हृदयाची काळजी आयुष्यभर घ्यायची आहे. कारण लाइफ कितीही फास्ट झालं तरी आपल्याबरोबर हृदय आयुष्यभर फिरणार आहे आणि तेच टिकवायचं आहे. त्यासाठी स्वत:वर थोडीशी बंधनं लादून घ्यायलाच हवीत. त्याशिवाय काही छोटे छोटे सावधगिरीचे फंडे आहेत, तेवढे सांभाळत राहिले तरी बरेचसे काम होऊन जाईल...
- डायटिंग करायचं म्हणजे लोणी, तूप खाणं टाळण्याकडे सगळ्यांचा कल असतो. हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तरीही लोणी, तूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण वास्तवात फॅट असलेले हे पदार्थ खाल्ल्यामुळे हार्टअटॅक येत नाही. त्यामुळे हे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. ऑलिव्ह ऑईलमध्येही फॅट असतातच. पण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय मजबूत राखण्यासाठी ते उपयुक्त ठरते, असे अलाहाबाद येथील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी म्हटले आहे. म्हणून लसणाच्या दोन पाकळ्या खाऊनच दिवसाची सुरुवात करायला हवी. त्यामुळे कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी त्याचा फायदाच होईल. 


- दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मधल्या वेळेत चटकमटक स्नॅक्स खाण्यापेक्षा एखादे सफरचंद किंवा नासपातीचे फळ खाणे चांगले. कारण दररोज किमान एक सफरचंद खाणार्‍यांना हृदयविकाराचा धोका बर्‍याच अंशी कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. किमान पाच बदाम आणि चार अक्रोड नियमित खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसे फॅट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मिळते. बदाम खाल्ल्याने हृदयरोग किमान २० टक्क्यांइतका दूर ठेवता येतो. अक्रोडात व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हृदयाच्या रक्षणासाठी ते खाणे फारच चांगले.

- नियमित कठोर व्यायाम, कसरती करण्याचीही गरज नाही. त्यासाठी दिवसातून फक्त ५ ते १० मिनिटे काढलीत तरी हृदयविकारापासून किमान ४५ टक्के दूर राहता येईल. त्यातूनही तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल तर आजपासूनच सुरू करा. ४० वयानंतरही व्यायामाला सुरुवात केली तरी शरीराला चांगला फायदा मिळतो. हृदयविकार दूर ठेवायचा तर बराच वेळ बसून राहू नका. शरीराची काहीतरी हालचाल व्हायलाच हवी.
- जे लोक दररोज किमान एकदा तरी सोडा पितात, मग तो डायट सोडा का असेना, पण सोडा प्यायल्याने हृदयविकाराची शक्यता किमान ५० टक्क्यांनी वाढते असं निदर्शनास आलंय. सोड्यामुळे पचनक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार आणि डायबिटीस दोन्ही बळावतात. वारंवार सोडा प्यायल्याने शरीरात जादा कॅलरीज जाऊन वजनही वाढते. हृदयविकाराचा झटका येण्यासाठी सोडाही कारणीभूत ठरतो.
- धान्य योग्य प्रकारचे असले तरीही हृदयविकार लांब ठेवता येतो. त्यामुळे धान्य चांगल्या प्रतीचे असायला हवे. गव्हासारख्या काही धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या मजबुतीसाठी ते योग्यच आहेत. त्याबरोबरच तांदूळ आहारात जास्तीत जास्त असलाच पाहिजे. ओट्स शरीरातील जादा कोलेस्ट्रोल घालवण्याचं काम नैसर्गिकरीत्या करतात. ओट्समुळे हृदयाचे कामही चांगल्या रीतीने चालते. म्हणून ओट्स खायलाच हवेत.


सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५  

Wednesday, March 11, 2015

तुळस

अंगणाला तुळशीशिवाय आणि घराला गृहलक्ष्मीशिवाय शोभा नसते हे अगदी खरं, पण वास्तविक पाहता जागेअभावी तुळस आणि तणावाअभावी गृहलक्ष्मी दिसणं म्हणजे आश्‍चर्य.
आजीने आईला सांगितलेलं एक वाक्य, ‘तुळशीची रोज मनोभावे पूजा कर, न मागता ती खूप काही देईल.’ आजीचे ते वाक्य आयुर्वेद अभ्यासल्यानंतर पटलं. तुळशीच्या पानांच्या रसाने शरीरातील जंतू मरतात. पानांचा लेप केल्यास वेदना, सूज कमी होते. गजकर्ण, त्वचाविकार यात पानांचा रस चोळावा, लगेच त्रास कमी होतो. चार थेंब कानात टाकल्यास कानातला ठणका लगेच थांबतो. रात्री झोपताना तुळशीचे बी पाण्यात भिजवून बुळबुळीत खीर खाल्ल्यास जोर न देता प्रात:र्विधी होतो. तुळशीच्या पानाचा रस रोज तोंडात धरल्यास दाताला कीड लागणे, तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यातून पू येणे आठवडाभरात बरे होते. तुळशीच्या पानांचा यकृताच्या कार्यावर परिणाम होऊन रक्तातील अशुद्धता पचवून रक्तशुद्धी करते. त्यामुळे हृदयावरचा अतिरिक्त भार नाहीसा होतो. हृदयाला बलवान करते. 
तुळशीचा रस मध घालून दिल्यास सर्दी-खोकला, पाठदुखी, ताप हे आजार दोन दिवसांत बरे होतात. लघवीतील जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुळशीच्या बिया सर्वांनाच परिचित आहेत. घाम आणून ताप घालवणारी तुळस म्हणून आजीबाईच्या बटव्यात उल्लेख आहे. विष्णुप्रिया असलेल्या तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश, स्वच्छता आणि पाणी द्या. दिवसातील १८ तास मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारे एकमेव रोपटं आहे. घरात प्राणवायूमुळे आरोग्य आनंदी वातावरण राहील. त्यामुळे धनलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी तणावमुक्त राहतील.
- आयुर्वेदानुसार आताच्या धावत्या युगात काय खावं? (विलास परब, पुणे)
- पूर्वीही प्रत्येकजण खूप शारीरिक व मानसिक काम करायचे आणि खाणंपिणंही करायचे. आता आपण प्रगतीच्या नावाखाली खाण्याच्या पद्धती प्रगत केल्या आणि त्यामुळे आजारांनाही प्रगती मिळाली. चुकीच्या खाण्यामुळे आजार वाढले की, आजारामुळे खाणंपिणं चुकीचे झाले. आपण महाराष्ट्रात राहतो. रोज सात्त्विक महाराष्ट्रीय जेवणच खाल्ले पाहिजे. जगाला आपलं जेवण आवडतं आणि आपल्याला...
सौजन्य :- फुलोरा, सामना ०७०३१५
दीपक केसरकरdeepakkesrkar@gmail.com