Thursday, September 27, 2018

पितृ पंधरवडा

नवरात्र ९ दिवस असते, गणपती १० दिवस असतात पण पितृपक्ष 'पंधरवडा' (१५ दिवस) असतो. तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित रहातो. कारण मृत्यूपश्चात असलेल्या अस्तित्त्वावर त्यांचा विश्वास नसतो.

पृथ्वीच्या दक्षिणेला 'पितर' लोक असतो व त्याची देवता अर्यमा असते. आपल्या पितरांना चांगली गति मिळावी म्हणून पुत्राने 'श्राध्दकर्म' करावयाचे असते. पुत्र या शब्दाचा अर्थच "पुं" नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र. देह सोडल्यानंतरचा जिवाचा प्रवास सुखकर व्हावा, त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्वपितरी अमावस्येला अपराण्ह काळी (दुपारी बारा वाजता) तज्ञ ब्राह्मण जो श्राध्दविधी करतात तो अत्यंत शास्त्रोक्त असतो. ह्या विधीकडे दुर्लक्ष करू नये.

श्री गुरुचरित्रांतील छत्तीसाव्या अध्यायात पितर कसे येतात व अन्नग्रहण करतात ते सविस्तर दिले आहे. दशरथ राजांच्या श्राध्दविधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे. एकनाथ महाराजांनी तर अडेलतट्टू ब्राह्मणांच्या नाकावर टिच्चून साक्षात पितरांनाच खाली आणले होते. मृत्यूनंतरचा जिवाचा प्रवास सोपा नसतो.  वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो. ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रध्दापूर्वक केला पाहिजे. ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात तो जर लक्षपूर्वक ऐकला तर याचे महत्व पटते. भाद्रपद कृ.१ पासून सुरू होणारा पित्रुपंधरवडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्वाचा असतो.

भाद्रपद अमावस्ये पर्यंत पितर हे पितृलोकातून अर्यमा देवतेच्या आज्ञेने पृथ्वीतलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्यूतिथीला त्याना आवाहन करून पिंडदान करायचे असते. जर नाही केले तर 'पितृदोष' नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते. म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये.

जातक समस्या घेऊन येतो तेंव्हा ज्योतिषाने ह्या दोन गोष्टी नीट होत आहेत ना याकडे आवर्जून लक्ष द्यावे. सर्वपितरी अमावास्या तर सर्व पितरांचे श्राध्दविधी करण्यासाठी उत्तमच. एकवेळ मृत्यूतिथीला नुसता शिधा किंवा चटावरचे श्राध्द चालेल पण सर्वपितरीला यथासांग विधी गुरुजींच्या मार्फतच करावेत. आपल्या मनाने कोणालातरी जेवायला बोलावणे, घराच्या गच्चीवर ताट वाढून ठेवणे, कोणत्यातरी संस्थेला देणगी देणे याने पितरांना संतोष होत नाही. वैदिक मंत्रांनी आवाहन करून सन्मानाने त्यांना आमंत्रित करावे लागते तरच ते पिंडग्रहण करतील. ज्ञानी ब्रह्मवृंदच ते शास्त्रोक्त कर्म करू शकतात.

पितृपंधरवड्याचा फार बाऊ करू नये. मंत्रिमंडळाचा वीस्तार पुढे ढकलणे, खरेदी लांबणीवर टाकणे, व्ययसायाचे करार न करणे, विवाहाची बोलणी सुध्दा न करणे, शुभ गोष्टींसाठी वर्ज्य  समजणे ही अंधश्रध्दा होय. सारासार विवेक करावा. नाही तर अन्न, पाणी आणि श्वासही वर्ज्य करावा लागेल. अतिरेक टाळावा

ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये.

~~~~~~
 कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जो पर्यंत  वैवस्वत मन्वन्तर आहे तो पर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिण्डाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रांस होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात.

सौजन्य :- नरेश सरकारे, वॉट्सअँप फॉरवर्ड