Sunday, October 12, 2014

रताळे एक अद्भुत भाजी

रताळे ही केवळ सर्वत्र उपलब्ध, कमी किंमत असलेली व स्वादिष्ट म्हणूनच नव्हे, तर ही भाजी खाण्यासाठी अनेक कारणे आहेत.
रताळे हृदयरोग दूर करते का किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते का? 
- उत्तर मात्र आश्‍चर्यकारक आहे - ‘‘हो’’! रताळे हे ‘ब ६’ जीवनसत्त्वाने भरलेले आहे. ‘ब ६’ जीवनसत्व आपल्या शरीरातील होमोसिस्टाइन नामक द्रव्य कमी करते, ज्यामुळे भरपूर त्रासदायक आजारांवर नियंत्रण येते व हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. 
या चमत्कारी भाजीमध्ये आणखी कोणती जीवनसत्त्वे आहेत?
- ब ६ जीवनसत्त्वाशिवाय या भाजीमध्ये सी, डी व ई जीवनसत्त्वे असतात.
या जीवनसत्त्वाचे आपल्या शरीराकरिता महत्त्व काय आहे?
- ही सारी जीवनसत्त्वे आपल्या शरीरात फार महत्त्वपूर्ण भूमिका साकार करतात. ‘ई’ जीवनसत्त्व ‘ब ६’सारखेच, ई जीवनसत्त्व एक ऍण्टीऑक्सिडेंट आहे, जे हृदयरोगाला कवचासारखे सुरक्षित ठेवते. ‘सी’ जीवनसत्त्व - सर्वांच्या माहितीनुसार ‘सी’ जीवनसत्त्व हे सर्दी व ताप यांसारख्या रोगजंतूपासून संरक्षण करते. पण फक्त काही लोकांना माहीत असेल की, हे महत्त्वाचे जीवनसत्त्व दात व हाडांच्या निर्मितीसाठी व पचन आणि रक्तपेशीच्या निर्मितीसाठी फार महत्त्वाचे ठरते. 
म्हणूनच रताळे हे फक्त लहान मुलांच्याच नव्हे, तर पौगांडावस्थेतील मुलांच्या आहारातही समाविष्ट केले पाहिजे. रताळ्याच्या सेवनाने जखमेच्या उपचाराची गती वाढते. ‘कोलाजेन’ नामक द्रव्य शरीरात तयार होऊन त्वचेचे तारुण्य टिकविण्यास मदत करते व आपणास तणावाशी लढण्यात मदत करते. त्याशिवाय आपल्या शरीराला कर्करोगाशी निगडीत टॉक्सिन्सपासून वाचविते. 
जीवनसत्त्वाची शरीरासाठी कशी मदत होते?
- ‘डी’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारशक्ती वाढवते व एकूणच संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ‘डी’ जीवनसत्त्व फक्त एक जीवनसत्त्वच नव्हे, तर संप्रेरकसुद्धा आहे. हे जीवनसत्त्व आपल्या शरीरात पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यावर तयार होते. 
आपली ऊर्जा पातळी उंच ठेवण्यासाठी, आपला मूड, आपली हाडे व दात मजबूत ठेवण्यास ‘डी’ जीवनसत्त्व फार महत्त्वाची भूमिका साकारते. गलग्रंथी (थायरॉईड ग्रंथी)साठीसुद्धा हे जीवनसत्त्व मदत करते. 
रताळ्यामध्ये काही खनिज पदार्थ असतात का?
- जीवनसत्त्वांशिवाय रताळे हे अनेक खनिज पदार्थांचे भांडार आहे. उदा. लोह, तांबे, मॅग्नेशियम व पोटॅशियम.
कमी हिमोग्लोबिन असलेल्या अथवा रक्ताशय असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन करावे का?
- कमी हिमोग्लोबीन असलेल्या अथवा रक्ताशय असलेल्या व्यक्तींनी या भाजीचे सेवन अवश्य करावे. सर्वांना माहीत असल्याप्रमाणे लोह हे द्रव्य शरीरातील ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. पण लोह हे द्रव्य आपल्या शरीरातील लाल व सफेद रक्तपेशीच्या उत्पादनासाठी, तणावाला प्रतिकार करण्यासाठी, योग्य रोगप्रतिकाराचे कार्य व चयापचय क्रिया (मेटबॉलिजम) प्रथिनाचा योग्य वापर यासाठी रताळे हे सर्वोत्तम. 
मॅग्नेशियमची शरीरात काही महत्त्वाची भूमिका असते का?
- रताळे हे मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. (मॅग्नेशियम हे विश्रांतीसाठी अथवा ताण घालविण्यासाठी अतिशय उत्तम).
परीक्षेपूर्वीची धाकधूक घालविणारे एक परिपूर्ण अन्न! निरोगी धमनी, रक्त, हाडे, हृदय, स्नायू व मज्जातंतूच्या सुरळीत कार्यासाठी मॅग्नेशियम हे द्रव्य फार महत्त्वाचे असते. 
शरीरातील पोटॅशियमची भूमिका स्पष्ट कराल का?
- रताळ्यात आढळणारे पोटॅशियम हे द्रव्य स्नायू आकुंचनासाठी, मज्जातंतू प्रेषणासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी व शरीरातील पाण्याचे प्रमाण व रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी मदत करते. खरं तर केळ्याहून अधिक पोटॅशियम हे रताळ्यातच आढळते. उच्च रक्तदाब (hypertension) व कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचा समावेश हा आहारातच करावा.
शरीरातील तांब्याची भूमिका स्पष्ट करा... 
- शरीरात ‘कोलाजेन नामक सफेद संयोजक पेशा जालातील प्रथिन घटकाचे उत्पादन करण्याकरिता तांब्याची भूमिका फार मोठी आहे. स्नायू निरोगी ठेवण्यास व त्वचा घट्ट ठेवण्यासाठी रताळे अतिउत्तम. रताळ्यातील तांब्याच्या द्रव्यामुळे ही एक उत्तम वृद्धत्वविरोधी अशी भाजी मानली जाते. 
रताळे हे वजन वाढविण्यासाठी/वजन कमी करण्यास मदत करते का?
- या भाजीचा समावेश आहारात वजन वाढविण्यासाठी/वजन कमी करण्यासाठी करावा. असे केल्याने आपण आपल्या इच्छित तंदुरुस्तीच्या ध्येयांना गाठू शकतो. रताळ्यातील ‘केरोट्नाय्ड’ नामक वनस्पती द्रव्य रोजच्या जीवनातील व्यायामामुळे, दैनंदिन हालचालीमुळे होणार्‍या नुकसानापासून संरक्षित करते.
या चमत्कारिक भाजीचा फुप्फुसावर काही परिणाम होतो का?
- संशोधनाप्रमाणे रताळ्यातील ‘क्वेरसेटिन’ नामक शक्तिवर्धक फॅयेटोतत्त्व श्‍वसनक्रियेसाठी मदत करतात. असोशी, परागज्वर व दमा हे काढून टाकणे व असोशीविरोधक गुणधर्म असलेली ही भाजी निश्‍चितच चमत्कारी आहे.
रताळ्यातील काही प्रतिकूल परिणाम असतात का?
- सर्वसाधारणपणे ही भाजी बहुतांशी लोकांनी खाणे उत्तम. तथापि एका छोट्या विभागात ही भाजी खाणे मात्र असुरक्षित ठरते. Fructose Malabsorption किंवा रताळ्यातील Fructose तंतुमय फलशर्करा पदार्थामुळे काही गळक्या आतड्यांचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच रताळे हे फलशर्करा सहन न करणार्‍या, गळके आतडे असणार्‍या, लहान व मोठ्या आतड्यांचे आजार असणार्‍या रुग्णांनी कमी प्रमाणात खावे.

डॉ. मानसी पी. डाके
-manasidake@yahoo.com

सौजन्य :- उत्सव, सामना १२१०१४

No comments: