Saturday, June 06, 2015

चायनीज किंवा थाय... झकास ‘वोक हाय’






येस सर...मिचमिच्या डोळ्याची चायनीज वाटणारी मुलगी दरवाजा उघडताच आदराने, पण इंग्रजी स्वागत करते... आणि मग वेटरपासून मॅनेजरपर्यंत दिसतात ते सगळेच ‘चायनीज’... इथं खरं चायनीज मिळणार हे पहिल्या फटक्यात उमजून जातं. मग ‘वोक हाय’मधला पुढचा टप्पा सुरू होतो.
सुरुवातीलाच ‘स्पेशल मंगोलियन सूप’... हळदीच्या रंगाचं. गाडीवर असा रंगही कधी दिसत नाही. त्यामुळे मनात संशय...‘नो सर’ लगेच खुलासा. ‘आम्ही रंग वापरत नाही. कुठलाही अनहायजेनिक किंवा केमिकल पदार्थ आमच्याकडे वापरला जात नाही. ना सॉसमध्ये ना सूपमध्ये. थेट कंपनीकडून घेतलेल्या ‘सॉस’बद्दल मी बोलणारच नाही, कारण ‘फूड ऍण्ड ड्रग’कडून मंजूर असलेले पदार्थच आम्ही वापरतो,’ हरी कोटीयन यांनी लगेच सांगून टाकले. संशय फिटला.
अन् मग खाताखाताच कोटीयन कुटुुंबाचा रुईयासमोरील ‘डीपी’ज... किंवा दुर्गा परमेश्‍वरीपासून ते अगदी आजच्या ‘वोक हाय’पर्यंतचा इतिहास हरी कोटीयन आणि त्यांचे मोठे बंधू प्रसाद कोटीयन यांनी सांगून टाकला. वयाच्या १६/१७ वर्षांपासून या दोघांनी कष्टाला सुरुवात केली. आज मुंबईत डीपीसह त्यांची ४ हॉटेले आहेत. चायनीज आणि थाई जेवणात त्यांचा हातखंडा आहे. मेहनतीचे आणि अभ्यासाचे फळ आहे. तिसरा भाऊ विनायक कोटीयनही आता गप्पात सहभागी झाला...
‘बिग बझार’ लोअर परळच्या समोरच आता त्यांनी ‘वोक हाय’ची शाखा सुरू केलीय. गंमत म्हणजे पहिल्या दिवसापासून ‘तरुणाई’ने इथले थाई फुड फुल एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. गप्पा मारता मारता सूप संपलं होतं आणि पुढ्यात खास ‘फ्रूट बीअर’ आली होती. दहावी-बारावीतली तरुणाई परवाच पार्टी करून गेली ‘फ्रूट बीअर’ची. त्यांची त्यांच्यापुरती एन्जॉयमेंट - नो अल्कोहोल फक्त फळांचा रस, पण दिसणं आणि फेसाळणं बीअरसारखंच मुलांना काय, करतात मजा.
‘वोक हाय’चा मेन मेनू म्हणाल तर बांबू राईस आणि ‘थाय किंवा बर्मीज’ करी. या करीजसाठी वापरलं जाणारा नारळाचं दूध खास थायलंडवरून आणलं जातं. त्यामुळे जाडसर ग्रेव्हीच्या या ‘करी’ज फार वेगळ्या असतात...पण त्यात चमचमीतपणा कमी असतो. ज्याला तिखटच हवं त्याने ते सांगायचं.
सुरुवातीला सूपमध्ये मंगोलियन सूपप्रमाणेच तिबेटी सूप ‘भूलुंग’ हा प्रकारदेखील ट्राय करायला हरकत नाही. ‘चिकन मोमोज’ हे स्टार्टर भन्नाटच स्टार्टर्सनंतर मेन कोर्स. नुडल्समध्ये ‘मलेशिअन फ्लॅट नुडल्स’ हा वेगळाच आणि जरासा तिखट प्रकार त्याच्या जोडीला ‘प्रॉंझ करी’ मुद्दाम मागवायची मजा येते. इथं उकडा तांदूळ नाही, कलर्स नाही आणि ‘अजिनोमोटो’ खवय्यास हवं तरच वापरलं जातं. त्यामुळे आधी खवय्याच्या आरोग्याची काळजी इथं घेतली जाते. चायनीज किंवा थाई पदार्थात स्पेशल फिश डिशही भारीच. रावस किंवा पापलेट थाई स्टाईल इथलं प्रसिद्ध आहे. ‘प्रॉन्स राईस तर मस्तच.
याखेरीज येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोअर परिसरातील कॉर्पोरेट दुनियेला खूश करणारी त्यांची ‘पार्सल’ पद्धती. ऑफिसेसला लागणारी पार्सल देताना आता खास ऑफिस पॅक, फॅमिली पॅक आणि पार्टी पॅक असा प्रकार त्यांना पुढे आणला आहे. ही खरं तर हैदराबाद बिर्यानी स्टाईल आहे. तिथं १० जणांचं बिर्यानी पॅक दिलं जातं. त्याचप्रमाणे एखाद्या ऑफिसला १२ जणांचं जेवण हवं तर तसा पॅक; कुणाच्या फॅमिलीत सहाजणांना तर तसं फॅमिली पॅक. पार्टी असेल तर तसं पार्टी पॅक. याखेरीज कूपन सिस्टीमही आहेच. त्यामुळे कार्पोरेट लाईफसाठी फंडा एकदम झकास. चवीलाही आणि वेळेलाही. शेवटचा प्रॉन्झ तोंडात टाकताना चवीचं पटलंही आणि वेळेचं म्हणाल तर ज्याच्या त्याचा अनुभव.


सौजन्य :- सामना ०६०६१५ 

ताक - आयुर्वेद





दही रोज खाऊ नका, पण रोज ताजं ताक प्यायलात तर चालेल हे घरातल्या मोठ्यांना बोलताना ऐकलं असावं. दही नको, पण दह्यापासून तयार होणारं ताक चालतं, हा विचारात टाकणारा प्रश्‍न, पण तो अगदी बरोबर आहे.
दही मुळात उष्ण, चिकट पचायला जड आणि रक्त खराब करण्यास अग्रेसर म्हणून ज्यांना ऍलर्जीमुळे सर्दी होते त्यांच्यामध्ये खूप दही खाण्याचा इतिहास दिसतो. ताक हा मुळात मंथनातून तयार होणारा भाग आहे. शास्त्रामध्ये सांगताना ताक हलके, किंचित तुरट व आंबट वातनाशक, कफघ्न व अग्नी वाढवणारा असून सूज, मूळव्याध, मूत्ररोग, दाह, बालरोग, अरुची, प्लीहावृद्धी, पांडू गुल्म व विषजन्य विकार यांचा नाश करतो. तापामध्ये मंदावलेली भूक, जिभेची चव आणि उत्साह परत आणण्यासाठी ताकात तयार केलेला मऊ पातळसर भात हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर आहे. उष्णतेमुळे शरीराचे कमी झालेलं पाण्याचे प्रमाण आणि शारीरिक थकवा दूर करणारं ताक हे सर्वोत्तम पेय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुर्वेदात मानसिक कारणामुळे होणार्‍या सोरयासिससारख्या त्वचा विकारात (आमलकी+मुस्ता) यात तयार केलेल्या ताकाच्या शिरोधारेचे उत्तम काम आहे हा अद्भुत योग आहे. धणे-जिरे पावडर व हिंग टाकून तयार केलेले ताक अन्न पचनास फायदेशीर असून पोटात गॅस जमा होऊ देत नाही.
आता तुम्ही ठरवा, शरीरात तुफान निर्माण करणारी थंड पेये घ्यावीत की घरच्या घरी उपलब्ध होणारं आणि मंथनातून तयार होणारं ताक घ्यायचं.
- वय वर्षे २६, अनियमित मासिक पाळी आणि अतिप्रमाणात रक्तस्राव असतो. उपाय सांगा. (आशा कुलकर्णी) ठाणे
- आपणास नाडी परीक्षण करून औषध घेण्याची आवश्यकता आहे. आपणास वैद्यकीय सल्ल्यानुसार शरीरशुद्धी औषधी योजना आणि आहार नियोजन करणे आवश्यक आहे. मासिक पाळीची पथ्य पाळून औषधी घेतल्यास हा त्रास लवकर बरा होतो.
सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५ दीपक केसरकर

हृदय दिवाणे सांभाळू! पुढे धोका आहे...

  बदललेली लाइफस्टाइल आणि फास्ट फूडच्या लागलेल्या सवयी आता तरुणाईला महागड्या ठरत आहेत. पळत्या लाइफमुळे त्रास वाढतोय. तर वेळीअवेळी अरबट चरबट खाल्ल्यामुळे स्वास्थ्य बिघडतेय. परिणामी हृदयावर ताण पडतोय... त्यामुळे वेळीच सावध... कारण पुढे धोका आहे...
मे महिना संपला... आता पावसाळा सुरू होईल. वातावरण बदलेल. नियम शिथिल होतील. बंधनं मोकळी होतील... जीभ चटावेल. रस्त्यावरच्या पावभाजीकडे म्हणा किंवा इतर फास्ट फूडकडे नजर जाईल. पण नकोच ते! आपल्याला आपल्या हृदयाची काळजी आयुष्यभर घ्यायची आहे. कारण लाइफ कितीही फास्ट झालं तरी आपल्याबरोबर हृदय आयुष्यभर फिरणार आहे आणि तेच टिकवायचं आहे. त्यासाठी स्वत:वर थोडीशी बंधनं लादून घ्यायलाच हवीत. त्याशिवाय काही छोटे छोटे सावधगिरीचे फंडे आहेत, तेवढे सांभाळत राहिले तरी बरेचसे काम होऊन जाईल...
- डायटिंग करायचं म्हणजे लोणी, तूप खाणं टाळण्याकडे सगळ्यांचा कल असतो. हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तरीही लोणी, तूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण वास्तवात फॅट असलेले हे पदार्थ खाल्ल्यामुळे हार्टअटॅक येत नाही. त्यामुळे हे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. ऑलिव्ह ऑईलमध्येही फॅट असतातच. पण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय मजबूत राखण्यासाठी ते उपयुक्त ठरते, असे अलाहाबाद येथील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी म्हटले आहे. म्हणून लसणाच्या दोन पाकळ्या खाऊनच दिवसाची सुरुवात करायला हवी. त्यामुळे कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी त्याचा फायदाच होईल. 


- दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मधल्या वेळेत चटकमटक स्नॅक्स खाण्यापेक्षा एखादे सफरचंद किंवा नासपातीचे फळ खाणे चांगले. कारण दररोज किमान एक सफरचंद खाणार्‍यांना हृदयविकाराचा धोका बर्‍याच अंशी कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. किमान पाच बदाम आणि चार अक्रोड नियमित खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसे फॅट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मिळते. बदाम खाल्ल्याने हृदयरोग किमान २० टक्क्यांइतका दूर ठेवता येतो. अक्रोडात व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हृदयाच्या रक्षणासाठी ते खाणे फारच चांगले.

- नियमित कठोर व्यायाम, कसरती करण्याचीही गरज नाही. त्यासाठी दिवसातून फक्त ५ ते १० मिनिटे काढलीत तरी हृदयविकारापासून किमान ४५ टक्के दूर राहता येईल. त्यातूनही तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल तर आजपासूनच सुरू करा. ४० वयानंतरही व्यायामाला सुरुवात केली तरी शरीराला चांगला फायदा मिळतो. हृदयविकार दूर ठेवायचा तर बराच वेळ बसून राहू नका. शरीराची काहीतरी हालचाल व्हायलाच हवी.
- जे लोक दररोज किमान एकदा तरी सोडा पितात, मग तो डायट सोडा का असेना, पण सोडा प्यायल्याने हृदयविकाराची शक्यता किमान ५० टक्क्यांनी वाढते असं निदर्शनास आलंय. सोड्यामुळे पचनक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार आणि डायबिटीस दोन्ही बळावतात. वारंवार सोडा प्यायल्याने शरीरात जादा कॅलरीज जाऊन वजनही वाढते. हृदयविकाराचा झटका येण्यासाठी सोडाही कारणीभूत ठरतो.
- धान्य योग्य प्रकारचे असले तरीही हृदयविकार लांब ठेवता येतो. त्यामुळे धान्य चांगल्या प्रतीचे असायला हवे. गव्हासारख्या काही धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या मजबुतीसाठी ते योग्यच आहेत. त्याबरोबरच तांदूळ आहारात जास्तीत जास्त असलाच पाहिजे. ओट्स शरीरातील जादा कोलेस्ट्रोल घालवण्याचं काम नैसर्गिकरीत्या करतात. ओट्समुळे हृदयाचे कामही चांगल्या रीतीने चालते. म्हणून ओट्स खायलाच हवेत.


सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५